Tuesday 25 March 2014

पत्रकारांचे राजकीय पक्षांना आवाहन

पत्रकारांच्या प्रश्नंासंदर्भात राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि त्याचा उल्लेख आपल्या जाहिरनाम्यातून करावा अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने कॉग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आम आदमी पार्टी, शेकाप, माकपं आदि पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी विविध पक्षांना पत्र पाठवून राजकीय पक्षांनी पत्रकारांच्या प्रश्नांकडे कशापध्दतीनं दुर्लक्ष केलंय याची इत्यंभूत माहिती दिली आहे. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजना, पत्रकार अपघात आणि आरोग्य विमा योजना, मुक्त पत्रकारांसाठी वेतन निश्चिती, मजिठिया आयोगाची तातडीने अंमलबजावणी,राज्यात जर्नालिझम युनिर्व्हसिटी स्थापन करणे,राज्य प्रेस कौन्सिल स्थापन करणे, अधिस्वीकृती समितीचे तातडीने पुनर्गठण करणे, टीव्ही पत्रकारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करणे आदि मागण्यांसाठी राज्यातील पत्रकार गेली पाच वर्षे सनदशीर मार्गाने आंदोलन करीत आहेत मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी देखील सातत्यानं पत्रकारंाच्या या मागण्यांची उपेक्षाच केली आङे असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे शिष्टमंडळ जेव्हा राजकीय नेत्यांना भेटते तेव्हा सारेच तुमच्या मागण्या रास्त असून आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही देत असतात पण निर्णय़ घेण्याची वेळ येते तेव्हा कधी समिती नेमून तर कधी अन्य फाटे फोडून विषय प्रलंबित ठेवले जातात.गेली अनेक वर्षे पत्रकार हाच अनुभव घेत असल्याने आता सर्वच पक्षांनी आपली भूमिका आपल्या जाहिरनाम्यातून स्पष्ट करावी अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी सर्वच प्रमुख पक्षांच्या अध्यक्षांकडं केली आहे.