Tuesday 16 July 2013

पत्रकारांच्या अधिवेशनास राजकारण्याना न बोलविण्याचा निर्णय

24-25 ऑगस्टला अधिवेशन
पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शन योजना या पत्रकारांच्या मागण्याबाबतच्या सरकारच्या नकारात्मक भूमिकेचा निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेच्या आगामी अधिवेशनासाठी कोणत्याही राजकीय नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून उदघाटन किंवा समारोपाच्या कार्यक्रमास बोलवायचे नाही असा महत्वपूर्ण निर्णय मराठी पत्रकार परिषद आणि औरंगाबाद येथील पत्रकारांच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाच्या तयारीची ही बैठक  रविवारी औरंगाबाद येथे झाली.यावेळी 
पत्रकारांचे प्रश्न सरकार हेतुतः दुर्लक्षित करीत असल्याबद्दल सर्वानीच तीव्र संताप व्यक्त केला.राज्यात दर चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत असताना सरकार कायदा करण्याबाबत केवळ आश्वासन देण्याशिवाय काहीच करीत नाही,विरोधकही पत्रकारांच्या प्रश्नाबाबत कमालीचे उदासिन आहेत .याबाबतच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी  परिषदेच्या अधिवेशनासाठी सत्ताधारी अथवा विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला उदघाटन किंवा समारोप कार्यक्रमास बोलवू नये अशी सूचना बैठकीत काही पत्रकारांनी के ल्यानंतर  त्याचे सर्वानीच स्वागत केले आणि  एकमुखाने हा निर्णय घेतला गेला.माध्यमांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष कऱणारे राजकीय पक्षांचे नेते आपल्याच व्यासपीठावर येऊन पत्रकारांना आत्मपरिक्षणाचे धडे देतात,पत्रकारांनी कसे वागावे याचेही सल्ले देतात,वस्तुतः आत्मपरिक्षणाची खरी गरज राजकारण्यांना असल्याच्या भावनाही बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचे उदघाटन मुख्यमंत्री करतात.ही परंपरा आहे.मात्र यावेळेस ही परंपरा प्रथमच खंडित होत आहे.मुख्यमंत्र्यांऐवजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ह्स्ते अधिवेशनाचे उद्घाघाटन करावे अशी सूचना यावेळी केली गेली ती देखील एकमताने मान्य करण्यात आली.उद्धघाटन कार्यक्रमास साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.या शिवाय मराठी,हिंदी.इंग्रजी पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकारांना निमंत्रित कऱण्यात येणार आहे.अधिवेशनासाठी सरकारकडून जे अनुदान दिले जाते तेही घ्यायचे नाही असेही यावेळी ठरविण्यात आले.