राज ठाकरे यांनी अर्णव गोस्वामी असतील किंवा राजदीप सरदेसाई असतील यांना मुलाखतीच्या वेळेस कशी वागणूक दिली ते आपण पाहिलंच आहे.( गोस्वामी आणि राजदीप सरदेसाई हे सध्याचे देशातील स्टार पत्रकार आहेत त्यांना अशा पध्दतीनं वागविलं जात असेल तर अन्य पत्रकारांची काय अवस्था असेल याची आपण कल्पना करू शकतो ) त्या अगोदर शरद पवार आणि गल्लाी बोळातील अन्य नेतेही पत्रकारांशी तुच्छतेच्या भावनेनेच वागत असल्याचं आपण अनुभवतो आहोत.पत्रकारांवरील हल्ले याच मानसिकतेचे द्योतक आहेत.यामुळेच असेल कदाचित पत्रकाराची नोकरी सर्वात भिकार नोकरी असल्याचं मानलं जात आहे.अमेरिकेत एका पाहणीतून हा निष्कर्ष समोर आलाय.
पत्रकारितेची प्रतिष्ठा असा प्रकारे कमी होत असल्यानंच पत्रकारितेचं आकर्षण कमी झाल्याचं गेल्या पाच वर्षात दिसून आलंय. त्यामुळं गेल्या पाच वर्षात पत्रकारितेत येणाऱ्यांचं प्रमाण घटलंय हे वास्तवही समोर आलंय.2022 पर्यत पत्रकारितेत करिअर करणाऱ्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटेल असंही या अहवालातून समोर आलंय.35 रूपये किलोचा कागद द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी रद्दी 10 रूपये किलोनं विकायची असा हा आतबट्टयाचा धंदा असल्यानं अनेक पाश्चात्य नियतकालिकं बंद केली जात आहेत.त्याचाही फटका पत्रकारांना बसत आहे.
सर्वात वाईट नोकऱ्या कोणत्या हे तपासण्यासाठी 200 विविध प्रकारच्या व्यवसायाची पाहणी केली गेली.शारीरिक श्रम,कामाच्या ठिकाणचे वातावरण,उत्पन्न,दबाव आणि नियुक्तयांची स्थिती या पाच आधारावर हे सर्व्हक्षण केलं गेलं.टॅक्शी ड्रायव्हर,आचारी,कचरा उचलणारे आदि नोकऱ्या वाईट असल्याचं दिसून आलं आहे.पत्रकारिता ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वाईट नोकरी आहे असंही दिसून आलंय.त्यामुळंच गेल्या पाच वर्षात पत्रकारिता नकोरे बाप्पा असंच अनेकजण म्हणायला लागलेत.आपल्या देशात लग्नाच्या बाजारातही पत्रकाराला फारशी मागणी नसल्याचं वारंवार दिसून आलंय.