Monday 20 July 2015

पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा झालाच पाहिजे - रामदास आठवले

मुंबई : महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यात चिंतनीय वाढ झाली आहे.पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणार्‍या पत्रकारांचे संरक्षण करणे शासनाचे काम असून पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांचे प्रमाण पाहता पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झालाच पाहिजे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी केली आहे.

मीरा-भाईंदर येथील पत्रकार राघवेंद्र दुबे यांची नुकतीच हत्या करण्यात आली. या हत्येचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला आहे. दिवंगत पत्रकार राघवेंद्र दुबे यांच्या निवासस्थानी आज रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी रविवारी भेट देऊन शोकाकुल दुबे परिवाराचे सांत्वन केले. रिपाइंतर्फे २ लाख सांत्वनपर मदत या वेळी देण्याचे आठवले यांनी जाहीर केले. दिवंगत पत्रकार राघवेंद्र दुबे हत्येची सीबीआय चौकशी करण्याची तसेच दुबे यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २५ लाखांची मदत देण्यात यावी, अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी केली. यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आठवलेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.