Saturday 27 December 2014

महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनेत वाढ !

महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी 2014 हे साल सत्वपरीक्षा पाहणारे ठरले. वर्षभरात राज्यात 72 पत्रकारांवर हल्ले झाले, 2 पत्रकाराचे खून झाले, मुंबईत एका पत्रकाराचे अपहरण झाले, 2 महिला पत्रकारांच्या घरावर हल्ले आणि अन्य किमान 4 महिला पत्रकारांचा विनयभंग करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. राज्यातील प्रतिष्ठित अशा सहा दैनिकांच्या कार्यालयावर समाजकंटकांनी हल्ले चढवून कार्यालयांची मोडतोड केली, तर पत्रकारांवर पोलिसांनी खोटे खटले भरण्याचे किमान बारा प्रकार उघडकीस आले आहेत. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. 
मागील वर्षी 63 पत्रकारांवर हल्ले झाले होते. त्यात यंदा हल्ल्याच्या 8 घटनांची भर पडली आहे. विशेष म्हणजे राज्यात युतीचे सरकार आल्यानंतरच्या गेल्या दीड महिन्याच्या काळात पत्रकारांवरील हल्ल्याच्या 21 घटना घडल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे राज्यातील पत्रकारांवर होणार्या हल्ल्याची गेल्या चार वर्षांपासून नोंद ठेवली जाते. राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या सर्वच घटना समितीपर्यत पोहचतात असे नसले तरी ज्या घटनांची माहिती समितीला मिळते त्या घटनांमध्येही चिंताजनक वाढ झाल्याचे समोर आले आहे. 

जालना येथील पत्रकार विठ्ठलसिंग गुलाबसिंग राजपूर यांची 22 मे रोजी हत्त्या करण्यात आली आहे. दुसर्या घटनेत ठाणे जिल्हयातील बडय़ा वृत्तपत्राचे अंशकालीन वार्ताहर शिवसिंह बाबूलाल ठाकूर यांनाही ठार करण्यात आले आहे. अनिल जोशी या मुंबईतील पत्रकाराचे अपहरण करण्यात आले होते. नंतर त्यांना सोडण्यात आले. पनवेल येथील चेतना वावेकर, रत्नागिरी येथील मयुरी सुपल,आणि पिंपरी-चिंचवड येथील अश्विनी सातव डोके यांच्या घरावर समाजकंटकांनी हल्ले केले. मुंबईत चार वेगवेगळ्या घटनांमध्ये महिला पत्रकारांचा विनयभंग केला गेला, त्यातील एका महिला पत्रकाराला बलात्काराची धमकी दिली गेली. वर्षभरात राज्यात सहा प्रतिष्ठित दैनिकांच्या कार्यालयावर हल्ले झाले.

राज्यात ज्या 72 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत त्यात सागर मेघे (नवी मुंबई), रमेश कांबळे (अलिबाग), गोकुळदास येशीकर (खोपोली), दिलीप राय (मुंबई), सचिन लोंढे (वालचंदनगर), संजय प्रसाद (मुंबई), आशिष बोरा (कर्जत-नगर), तुषार खरात (मुंबई), विनोद कळसकर (अकोला), विजय मिश्रा (शेगाव), रवी कोटंबकर (मुंबई), सागर वैद्य (मुंबई), दिनेश लिंबकर (बीड), सचिन यादव (खोपोली), शिरीष वाकटानिया (मुंबई), संतोष भागवत (श्रीगोंदा), संतोष लोहकर (नांदेड), प्रवीण तुपसौदर (सोलापूर) यांचा प्रामुख्याने समावेश आहे. बहुतेक हल्ले हे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडूनच झाल्याचे वास्तवही समोर आलेले आहे. तसेच वर्षभरात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने सहा तरूण पत्रकारांचे ह्रदयविकाराने निधन झाल्याचेही उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही वेळोवेळी पत्रकार संरक्षण कायदा करण्याचे आश्वासन दिलेले आहे.ही सारी वस्तुस्थिती आणि पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या घटनांचा लक्षात घेऊन महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा तातडीने लागू करावा, अशीही मागणी एस.एम.देशमुख यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे.